पुणे (खडकवासला) : सिंहगड व पानशेत परिसरातील जंगलात सध्या बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पावसामुळे वाढलेल्या गवत आणि झुडपांच्या आडून बिबटे सहजपणे हालचाल करत असल्याने त्यांचा वावर जंगलातील रस्ते, गाव व वाड्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन सिंहगड वन विभागाचे अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, सध्या सिंहगड परिसरात २० ते २५ बिबटे आहेत. त्यातील ६ ते ७ बिबटे सिंहगड किल्ल्याच्या थेट परिसरात राहतात. किल्ल्याच्या पश्चिम भागातील पानशेत, वरसगाव आणि राजगड परिसरात उर्वरित बिबट्यांचा वावर आहे. या भागात पावसामुळे अन्न-पाण्याची मुबलकता असल्याने बिबटे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत.
कल्याण गावातील करंजाईदेवी मंदिराच्या आवारात नुकतीच रात्री साडेदहाच्या सुमारास एक बिबट्या आला होता. स्थानिक तरुणांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणही केले. आवाज झाल्यानंतर बिबट्या झुडपांतून निघून गडाच्या जंगलात पसार झाला.
वन विभागाने असेही निदर्शनास आणले की, काही पर्यटक इंग्लिश व हायब्रीड जातीची शिकारी कुत्री जंगलात सोडून जात आहेत, जी शेतातील जनावरांवर आणि वन्यजीवांवर हल्ला करत आहेत. यामध्ये शेळ्या-मेंढ्या, ससे, हरीण, माकडे, चितळ यांचा समावेश आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.