धायरी: धायरीतील रायकर मळा भागातील श्री ज्वेलर्स या सराफ दुकानाने ‘सुवर्ण भिशी’च्या नावाखाली गोरगरीब नागरिकांची, विशेषतः महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्यात ही फसवणूक लपवण्यासाठी दुकान मालकाने खोटा दरोडा रचून पोलिस आणि ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर गायब होऊन ठेवीदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिंहगड रोड परिसरात परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सुवर्ण भिशीच्या नावाखाली लाखो रुपये जमा करून लोकांचा विश्वासघात करणारा दुकानदार विष्णू दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती दहिवाळ यांनी ३६ ठेवीदारांची फसवणूक करून सध्या फरार असून, या फसवणुकीमुळे अनेक गोरगरीब, कष्टकरी महिलांचे संसारच उध्वस्त झाले आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, श्री ज्वेलर्सच्या मालकाने काही दिवसांपूर्वी आपल्या दुकानात दुपारी बनावट दरोडा घडवून आणला. तपासात पोलिसांनी उघड केले की, हा दरोडा खरा नसून, दुकानदाराने स्वतःच्या आर्थिक अपयशाचे आणि ठेवीदारांचे पैसे परत न करण्याचे नाट्य उभे करण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक अडचणीत सापडलेला दुकानदार ठेवीदारांचे पैसे परत करू शकत नव्हता. त्यामुळे सहानुभूती मिळावी, वेळ मिळावा आणि फसवणुकीचा दोष टळावा या हेतूने बनावट गुन्ह्याचे नाट्य उभे केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत हबीब व त्यांच्या पत्नीने श्री ज्वेलर्समध्ये भिसीच्या माध्यमातून १ लाख ३० हजार रुपये गुंतवले होते. त्याशिवाय याआधी घेतलेले १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडून त्याचे १ लाख ९ हजार रुपये व आणखी १ लाख रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात भरून, ४ तोळे वजनाचे गंठण घेण्यासाठी एकूण ३ लाख ३९ हजार रुपये दहिवाळ दांपत्याकडे जमा केले. मात्र, २५ मे रोजी दुकान बंद आढळले आणि त्यानंतर दहिवाळ दांपत्य फरार झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. याशिवाय इतर ३५ नागरिकांनी देखील दरमहा भिसी स्वरूपात रोख रकमा व काहींनी थेट सोने आरोपींकडे गुंतवले होते. त्यांनी एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये व २१ तोळे वजनाचे सोने अशी फसवणूक केली आहे.
पोलिस तपासात ३६ गुंतवणूकदारांनी दहिवाळ यांच्याकडे पैसे आणि सोने गुंतवल्याचे समोर आले. दहिवाळ दाम्पत्याने मिळून ४२ लाख ७८ हजार आणि २१ तोळे सोने घेऊन पलायन केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस, निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे तपास करत आहेत
धायरीतील श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने केलेली फसवणूक ही केवळ एक आर्थिक घोटाळा नव्हे, तर संस्कार, विश्वास आणि आयुष्यभराची जमवाजमव या साऱ्यांवर उठलेला एक आघात होता. अनेक महिलांनी संसाराच्या गरजा भागवून, छोट्या-छोट्या खर्चांवर काटकसर करून भिशी लावल्या, सोनं गहाण ठेवले. त्यामागे मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न होतं, सणासुदीचा एक सोन्याचा दागिना होता, आणि थोडं थोडं करत उभं केलेलं भविष्यासाठीचं सुरक्षिततेचं कवच होतं.
राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद:
धायरी परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, सरकारने महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध आणि संरक्षण MPID कायद्यानुसार तातडीने या लोकांचे पैसे वसूल करून परत द्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच, अशा प्रकारच्या अनधिकृत भिशी योजना, सोनं गहाण ठेवून अनियमित व्यवहार करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई आणि नोंदणी सक्तीचे धोरण राबवावे, अशी मागणी जोर धरते आहे.
धायरीत घडलेला हा प्रकार केवळ एक आर्थिक गुन्हा नाही. तो विश्वासघात, सामाजिक दुर्लक्ष आणि गरीबांच्या स्वप्नांचा संहार आहे. सरकारने केवळ आरोपींना पकडून शिक्षा देणं पुरेसं नाही, तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर धोरणांची अंमलबजावणी करावी लागेल.