धायरी: पुणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, सध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच नव्याने समाविष्ट गावांना दुय्यम वागणूक मिळण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत ११ गावांचा एकत्रित प्रभाग ४२ करण्यात आला होता. आता देखील अशीच एकगठ्ठा रचना करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे.
“पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांची संख्या कायम राहावी. नव्याने समाविष्ट गावांना एकत्रित करून किंवा जुन्या प्रभागांमध्ये विलीन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. असा आरोप केला आहे. त्या ऐवजी १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांची 2002 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी, वडगाव धायरी परिसराची सुमारे सात हजार मतदार संख्या तीन उमेदवारांचा प्रभाग होता. त्याप्रमाणेच यंदा देखील समाविष्ट गावांची स्वतंत्र प्रभाग रचना झाली पाहिजे. कमी मतदार संख्या असली तरी, स्वतंत्र प्रभाग झाला पाहिजे. त्या गावातून चार ऐवजी दोन- तीन सदस्य संख्या झाली तरी चालेल.”
याविरोधात आवाज उठविणे आणि विकासकामांतील सातत्याने होणारे दुर्लक्ष थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे समितीचे मत असून, याच उद्देशाने आज शुक्रवार, दिनांक २७ जून रोजी सायंकाळी सहा वाजता धायरी येथील सावित्री गार्डन मंगल कार्यालय येथे सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व समाविष्ट गावांतील नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.