या वर्षीपासून संत तुकाराम महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी 'आचारधर्म नियमावली', ध्वजासाठी सुती कपड्याला ‘काव' रंगाचा वापर

Regulations for Warkaris in the Dindi of Sant Tukaram Maharaj from this year


पुणे: जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून बुधवार, दिनांक १८ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. 'पंढरीची वारी आहे माझे घरी' या संतवचनाप्रमाणे लाखो वारकरी आणि भाविक देहू-आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षांत पालखी सोहळ्यातील भाविकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे काही अडचणी उद्भवू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहू संस्थानने यंदा प्रथमच 'आचारधर्म नियमावली' प्रसिद्ध केली आहे.


इ.स. १६८५ मध्ये संत तुकाराम महाराजांचे तृतीय पुत्र संत नारायण महाराज यांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा आज 'महासागरासारखा' विस्तारलेला असून, स्वयंशिस्तीत चालणारा हा सोहळा देशविदेशातील भाविकांनाही आकर्षित करत आहे. वारी ही केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी परंपरा असून, ती अधिक सुसंघटित व नियमबद्ध व्हावी या हेतूने संस्थानने ही नियमावली जाहीर केली आहे.


असा आहे आचारधर्म…  

  • दिंडीतील सर्व पताका (वारकरी ध्वज) सुती कापड असलेल्या व काव रंगाचा वापर केलेल्या असाव्यात.  
  • पताकाधारी यांच्या मागे टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, नंतर तुळशीवाली आणि महिला वारकरी असा क्रम असावा.  
  • दिंडीतील वारकऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा,  विणेकऱ्याने धोतर, फेटा परिधान करणे आवश्यक आहे. 
  • दिंडीतील भजन हे वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे, भजन गौळण-हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे. (काकडा सकाळी लवकर व्हावा)  दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये.
  • दिंडीत चालताना सोहळा सोडून मागे-पुढे चालू नये.  
  • रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, विणेकरी, तुळशी वाली, हांडेवाली, पखवाज सहभागी व्हावे.


नियमावलीनुसार, दिंडीतील सर्व पताका (ध्वज) हे सुती कापडाचे आणि काव रंगाचे असावेत. त्यामध्ये कोणत्याही राजकीय अथवा प्रचारात्मक चिन्हांचा समावेश असू नये. पताकेनंतर टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, तुळशीवाली आणि महिला वारकरी असा दिंडीचा क्रम राखावा. दिंडीत सहभागी होणाऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, पायजमा, टोपी, फेटा यांसारखा पारंपरिक पोशाख वापरणे आवश्यक आहे.


भजन, गौळण व हरिपाठ हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार असावेत. 'काकड' सकाळी लवकर व्हावा, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्यांनी कोणतेही व्यसन करू नये, तसेच वारीदरम्यान सोहळा सोडून इधर-उधर फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


या आचारधर्मामध्ये शिस्त, भक्तिभाव आणि समर्पणाचा मूळ गाभा जपण्याचा प्रयत्न झाला असून, नव्या भाविकांनाही वारीचे शिस्तबद्ध स्वरूप समजावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.


वारीच्या आध्यात्मिक आणि सामाजिक सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याने ही नियमावली पाळावी, असे आवाहन देहू संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.