पुणे: राज्यातील शालेय शिक्षण विभागामार्फत इ. ११ वी (अकरावी) प्रवेश प्रक्रिया सन २०२५ साठी २६ मे २०२५ पासून औपचारिकपणे सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून आपला प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन शासनाने केले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा विद्यार्थ्यांसाठी एक नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावर ‘Career Path’ (करिअर पाथ) नावाची एक विशेष लिंक दिली असून, यामध्ये १५० पेक्षा अधिक करिअर मार्ग, त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती, शैक्षणिक पात्रता, भविष्यकाळातील संधी, तसेच व्यावसायिक क्षेत्रातील गरजांनुसार मार्गदर्शन देण्यात आले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी केवळ अकरावीच्या प्रवेशापुरती मर्यादित न राहता, भविष्यातील करिअर निवडीसाठी योग्य दिशा ठरवू शकतील.
या विभागात १५० हून अधिक करिअर पर्यायांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक करिअरशी संबंधित अभ्यासक्रमाची रचना, आवश्यक शैक्षणिक पात्रता, संबंधित व्यावसायिक क्षेत्र, नोकरी/स्वरोजगाराच्या संधी, पुढील उच्च शिक्षणाच्या दिशा आणि भविष्यातील वाढीची शक्यता अशा अनेक महत्त्वाच्या बाबी समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांपुरते मर्यादित न राहता, नविन युगातील करिअर जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मीडिया, हरित तंत्रज्ञान, उद्योजकता आदी क्षेत्रांमध्येही माहिती मिळवता येणार आहे.
ही सुविधा केवळ शहरी नव्हे, तर ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पालकांनीही या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
कधीपासून कधीपर्यंत करता येईल अर्ज-नोंदणी
या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीप्रक्रिया आज नव्याने म्हणजेच 26 मे पासून सुरु झाली आहे. विद्यार्थी आपली नोंदणी 3 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करु शकतील. यानंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होईल. विद्यार्थी या वेळेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतात, तसेच इच्छित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी देखील देऊ शकतात.
अर्जासाठी वेबसाईट अन् महाविद्यालयाची निवड
प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे.
अर्ज कधी आणि कसा करायचा?
https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी लिंकवर क्लिक करावी.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त १० कनिष्ठ महाविद्यालये पसंती यादीत निवडावी लागतील.
आवश्यक ती माहिती व कागदपत्रे (१० वीचा निकाल, जात प्रमाणपत्र, आधार क्रमांक, फोटो इत्यादी) अपलोड करावी.
अर्ज सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोर्टलवरून गुणवत्ता यादी आणि कॉलेज वाटपाचा मागोवा घ्यावा.
महत्त्वाच्या तारखा: टप्पा तारीख/वेळ
नोंदणी व अर्ज भरण्याची सुरुवात २६ मे २०२५
नोंदणीची अंतिम तारीख ३ जून २०२५ सायं. ६ वाजेपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर ५ जून २०२५ सकाळी ११ वाजता
आक्षेप व दुरुस्तीचा कालावधी ६ व ७ जून २०२५
अंतिम गुणवत्ता यादी ८ जून २०२५ सायं. ४ वाजता
शून्य फेरी (कोटा, इन-हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन) ९ ते ११ जून २०२५
प्रथम फेरीचे कॉलेज वाटप जाहीर १० जून २०२५ सकाळी १० वाजता
पसंतीचे महाविद्यालय निवडा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भरा
अधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घ्या.
फाॅर्म भरायला अडचण आली तर येथे संपर्क करा
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 8530955564 / 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.