पुणे: श्री शंकर महाराज समाधी मठ, पुणे येथे मंगळवार दिनांक ३ जून २०२५ रोजी ५० व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ मा. आमदार उल्हास पवार आणि उद्योजक श्री पुनीत बालन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी ३२१ भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
गेल्या ५० महिन्यांपासून दरमहा दुर्गाष्टमीच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून, तिच्या सामाजिक योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गौरवचिन्ह देऊन संस्थेचा सन्मान केला आहे.
शंकर महाराज समाधी ट्रस्ट फक्त रक्तदानापुरतेच कार्य मर्यादित न ठेवता, दररोज ५,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसादाचे वितरण करते. या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी शाळा, नवी पेठ येथे नित्यनेमाने मोफत भोजन प्रसाद वाटप केला जातो, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर यांनी दिली.
या प्रसंगी आमदार उल्हास पवार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “आज मठ-मंदिर यांसारख्या धार्मिक संस्था केवळ आध्यात्मिक कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता, समाजोपयोगी कार्यांमध्ये सक्रिय सहभागी झाल्या पाहिजेत. अशा उपक्रमांमुळे तरुणांना श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या आध्यात्मिक वारशासोबत समाजसेवेचेही महत्त्व पटते.” त्यांनी धार्मिक कार्याला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होणे ही काळाची गरज असल्याचेही मत मांडले.
कार्यक्रमात उपस्थित उद्योजक श्री पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच, या सुवर्णमहोत्सवी उपक्रमाचे समन्वयक श्री राम बांगड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विश्वस्त डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), श्री सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, श्री राजाभाऊ सूर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.