पुणे: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील ‘द क्राऊन ग्रीन’ या उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे (वय २५) असं या तरुणीचं नाव असून, ती मूळची महाराष्ट्रातील असून काही महिन्यांपासून पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होती.
सुसाईड नोटमधून मानसिक त्रासाचा खुलासा
ही घटना ५ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अभिलाषा पहाटे साडेचार वाजता दुचाकीने सोसायटीमध्ये दाखल झाली आणि थेट लिफ्टने २१ व्या मजल्यावर गेली. काही वेळातच तिने टोकाचं पाऊल उचललं. तिच्या घरातून पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली असून त्यामध्ये लिहिलं आहे: "सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा संपली आहे." ही चिठ्ठी तिच्या मनातील खोल नैराश्याची जाणीव करून देते. मात्र तिने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलीस तपास सुरु, घातपाताची शक्यता फेटाळली
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आलेली नाही. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचा कारण म्हणजे उंचावरून पडल्यामुळे आलेल्या गंभीर इजा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नैराश्यच कारण?
अभिलाषा कोथंबिरे हिच्या आत्महत्येचं नेमकं कारण सध्या तरी स्पष्ट झालेलं नसून, ती वैयक्तिक आयुष्यातून किंवा नोकरीच्या तणावातून मानसिक नैराश्यात सापडली होती का, याचा तपास सुरू आहे. तिच्या सहकाऱ्यांची, मित्रमंडळींची चौकशी करण्यात येत आहे.
समाजात खळबळ, मानसिक आरोग्याविषयी पुन्हा प्रश्न
अशा घटनांमुळे मानसिक आरोग्याविषयी समाजात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. तणाव, नैराश्य आणि एकटेपणाच्या गर्तेत अडकलेले तरुण अशाप्रकारे आपले जीवन संपवत असल्याने सामाजिक पातळीवर या प्रश्नाचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
आय टी क्षेत्रातील अभियंत्यांच्या नैराश्याची करणे आणि उपाय
माहिती व तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चकाकी, उच्च पगार, आंतरराष्ट्रीय संधी आणि आधुनिक कामपद्धतीमुळे हे क्षेत्र आकर्षक मानलं जातं. परंतु या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे, आणि नैराश्य हे एक गंभीर संकट बनून समोर येत आहे. अनेक अभियंते आपल्या संघर्षांबद्दल बोलत नाहीत, पण आतून तुटत चाललेले असतात.
या क्षेत्रात कामाचा ताण अत्यधिक असतो. सततच्या डेडलाईन्स, अपूर्ण झोप, वेळेचा अभाव आणि १० ते १२ तास संगणकासमोर काम करत राहण्याची सवय शरीरासोबतच मनालाही थकवते. वर्क फ्रॉम होमच्या प्रणालीमुळे एकटेपणा वाढला असून, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी होणारा संवादही कमी झाला आहे. अनेक वेळा क्लायंट्सचे प्रेशर आणि मॅनेजमेंटकडून होणाऱ्या अपेक्षा या मनावर भार टाकतात. कामाचा दर्जा चांगला असूनही प्रमोशन किंवा संधी न मिळाल्यास असमाधानाची भावना निर्माण होते. याशिवाय कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे झोप आणि आहाराच्या वेळा विस्कळीत होतात, ज्याचा थेट परिणाम मानसिक संतुलनावर होतो.
असे सर्व ताण सहन करत असताना, IT कर्मचाऱ्यांना अनेकदा ऑफिसमधील राजकारणाचाही सामना करावा लागतो. काही जण गटबाजी करतात, श्रेय घेऊन इतरांना मागे टाकतात, वरिष्ठांशी जवळीक ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना डावलतात. हे वातावरण अन्यायकारक वाटतं आणि मनात खोलवर अस्वस्थता निर्माण करतं. काहीवेळा या अस्वस्थतेचं रूपांतर नैराश्यात होतं, आणि व्यक्ती आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळते.
या सर्व समस्यांवर उपाय शक्य आहेत, पण त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर जागरूकता आणि संस्था पातळीवर संवेदनशीलता आवश्यक आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवावा — ध्यान, व्यायाम, एखादा छंद यामुळे मनाला आधार मिळतो. झोपेचं आणि आहाराचं नियोजन हे शरीरासोबतच मनासाठीही उपयुक्त आहे. राजकारण किंवा गॉसिपमध्ये सहभागी होण्याऐवजी शांतपणे आपलं काम चोख पार पाडणं, आणि गरज भासल्यास HR किंवा समुपदेशकाशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं ठरतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे – मानसिक त्रास किंवा नैराश्य वाटत असल्यास ते लपवू नये. हे कमजोरी नाही, तर एक आजार आहे, आणि यावर उपाय शक्य आहेत. संवाद, समुपदेशन आणि वेळेवर केलेली मदत हीच नैराश्य टाळण्याची खरी चावी आहे.