पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPL) कडून १ जून २०२५ पासून लागू करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीविरोधात पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दरवाढ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या दरवाढीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाने पुणे महापालिकेच्या आवारात बैलगाड्या, सायकली आणि घोडे घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. यामुळे या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू आहे.
दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांची फरफट
दररोज PMPL बसने प्रवास करणारे कामगार, नोकरदार, विद्यार्थी यांना या दरवाढीचा थेट फटका बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सांगितलं, “दिवसभर श्रम करून पैसे कमावणाऱ्या लोकांचा मोठा खर्च आता फक्त प्रवासावर जात आहे. ही दरवाढ सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे.”
"पुन्हा टांग्याचा काळ परत?"
आंदोलनादरम्यान पक्षाचे पदाधिकारी म्हणाले, “पुणे पूर्वी सायकलींचं आणि टांग्याचं शहर म्हणून ओळखलं जायचं. सरकारने केलेल्या प्रचंड दरवाढीमुळे आता पुणेकरांना पुन्हा सायकल, बैलगाडी किंवा टांग्याने प्रवास करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सरकार सामान्य जनतेला जगू देणार की नाही?”
मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका
या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा घोडेस्वारीचा जमाना परत आला आहे,” अशा उपरोधिक घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.
महिला पदाधिकाऱ्यांचा बैलगाडीतून निषेध
या आंदोलनात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. काही महिला पदाधिकारी बैलगाडीतून महापालिका आवारात दाखल झाल्या आणि या दरवाढीविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. "ही दरवाढ त्वरित रद्द केली नाही, तर आम्ही अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू," असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नव्या दरवाढीचा मुद्दा सध्या शहरात चांगलाच गाजतो आहे. महापालिकेवर आंदोलन झाल्यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे.