आळंदी: (प्रतिनिधी) महाराष्ट्राची संत परंपरा, वारकरी चळवळ आणि भक्तीची पराकाष्ठा दर्शवणारी आषाढी वारी २०२५ सध्या राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे. लाखो भाविक, वारकरी, दिंड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या भेटीसाठी सज्ज होत आहेत. याच भावनिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीहून निघणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळेत यंदा बदल करण्यात आला आहे.
१९ जून रोजी रात्री ८ वाजता प्रस्थान
दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा दुपारी ४ वाजता आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. मात्र, यंदा १९ जून २०२५ रोजी गुरुवारी प्रस्थान होणाऱ्या या पालखीचा सोहळा रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. प्रस्थान वेळेत चार तासांचा बदल का करण्यात आला, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
‘गुरुवार सोहळा’चा नीतिनियम आणि परंपरा
या निर्णयाबाबत माहिती देताना पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी सांगितले, "दर गुरुवारी, नित्य नियमाप्रमाणे माऊलींची पालखी 'गुरुवार सोहळा' म्हणून निघते. यंदा प्रस्थानाचा दिवसच गुरुवार आल्यामुळे प्रथम गुरुवारची पालखी निघेल, त्यानंतर आरती होईल आणि मग मुख्य प्रस्थान सोहळा पार पडेल. त्यामुळे वेळेत चार तासांचा बदल आवश्यक ठरला." या परंपरेनुसार आधी स्थानीक गुरुवार पालखी सोहळा, मग सायंकाळी आरती आणि शेवटी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, असा पालखी प्रस्थानाचा क्रम ठेवण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या सहभागासाठी सुसूत्र नियोजन
पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल झाल्याने वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि विश्वस्त मंडळाने विस्तृत जनजागृती आणि नियोजन केले आहे. विश्वस्त रोहिणी पवार यांनी सांगितले, "सूर्यास्तापूर्वी गुरुवारची पालखी काढली जाईल. सूर्यास्तानंतर माऊलींची आरती होईल आणि त्यानंतर मुख्य प्रस्थान सोहळा सुरू होईल. यामध्ये वारकऱ्यांची सोय आणि परंपरा यांचा योग्य समन्वय साधला गेला आहे."
प्रशासनाची तयारी; वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक नियमन, वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अशा बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पोलीस, महापालिका, आरोग्य विभाग, आणि स्वयंसेवी संस्था यांचा समन्वय राखून वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची अनुभूती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.