मुंबई: (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या संपादक व पत्रकारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्य सरकारने डिजिटल मीडियाला अधिकृत राजमान्यता देत शासकीय जाहिराती देण्याचा निर्णय अधिकृत परिपत्रकाद्वारे आज घोषित केला. या निर्णयामुळे चॅनल्स आणि वेब पोर्टल्सना आता शासकीय जाहिरातींसाठी पात्रता प्राप्त होणार असून, हे डिजिटल माध्यमांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
सहा वर्षांच्या संघर्षाला यश
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, ज्याचे नेतृत्व वरिष्ठ संपादक राजा माने करत आहेत, या मागणीसाठी गेली सहा वर्षे शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होती. सन २०१९ पासून विविध टप्प्यांवर चर्चा, पत्रव्यवहार आणि बैठका होत होत्या. अखेर आज त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
संघटनेच्या वतीने भिलार (महाबळेश्वर) आणि कनेरी मठ (कोल्हापूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशनांत डिजिटल मीडियाला मान्यता आणि शासकीय जाहिराती मिळाव्यात, यासाठी ठोस प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्या अधिवेशनांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते. या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अखेर आज शासन निर्णयाच्या स्वरूपात कृती झाली.
राज्यभरातील पत्रकारांना लाभ
या निर्णयाचा थेट फायदा महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना होणार आहे. हे माध्यम राज्यातील कोट्यवधी लोकांपर्यंत बातम्या पोहोचवतात, मात्र अद्यापपर्यंत त्यांना राजकीय किंवा शासकीय पातळीवर मान्यता नव्हती. आज जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित झाले असून या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे योगदान
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी डिजिटल पत्रकारांची संघटना असून देशभरातील १२,००० हून अधिक संपादक व पत्रकार या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. संघटनेच्या वतीने सतत शासन दरबारी पाठपुरावा केला जात होता. विविध मंत्री, सचिव, आणि शासनस्तरावरील अधिकाऱ्यांशी बैठका घेण्यात आल्या. शेवटी या निर्णयाच्या माध्यमातून त्या प्रयत्नांना अधिकृत यश मिळाले आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले असून या ऐतिहासिक टप्प्याबद्दल सर्व डिजिटल पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले आहे.